मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो दरात केलेल्या पाव टक्के कपातीमुळे गृहकर्जे स्वस्त होतील, तसेच रोखीची कमतरता दूर होईल, परिणामी रिअल इस्टेट क्षेत्रात खरेदीला चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केली.
‘नाईट फ्रँक इंडिया’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल म्हणाले, ‘रेपो दरातील कपात निश्चितपणे रिअल इस्टेट क्षेत्रासाठी एक स्वागतार्ह पाऊल आहे. चांगल्या क्रेडिट दराबरोबरच उच्च तरलतेच्या बाबतीत कमी पॉलिसी रेटचा लाभ बँकांद्वारे एनबीएफसी, तसेच घर खरेदीदारांना हस्तांतरीत केला जाईल. रोखीची कमी असलेल्या ‘एनबीएफसी’ निश्चितपणे भांडवलाच्या प्रवाहातून लाभ मिळवतील, ज्यामुळे विकसक, तसेच घर खरेदीदारांना फायदा होईल.
पॅरेडिम रिअल्टीचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ मेहता म्हणाले, ‘बेरोजगारी, कमी होत असलेला जीडीपी या पार्श्वभूमीवर खालावत असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये तरलता आणण्याकरता रेपो दरातील कपात आवश्यक होती. सीपीआय २.५ टक्क्यांच्या खाली असल्याने आणि नुकत्याच कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे अधिक व्याज दर कपात बाजारासाठी अधिक उत्साही झाली असती. भविष्यात आणखी दर कपात होण्याची आमची अपेक्षा आहे. रेपो दरातील कपातीमुळे गृहकर्जाचे दर कमी होतील, तसेच कमी जीएसटी, मध्यमवर्गासाठी ६.५ लाख रुपयांपर्यंत (वर्ग ८० सीसह) कर सवलत या बाबी रिअल इस्टेटला विक्रीसाठी चालना देतील, अशी आशा आहे.’
पोद्दार हाउसिंग अँड डेव्हलपमेंट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक रोहित पोद्दार म्हणाले, ‘रेपो दर कमी करणे अनिवार्यपणे अलिकडच्या काही महिन्यांत अर्थव्यवस्थेतील व्यापक आधारावर घसरण झाल्यामुळे चालते. रेपो दर पाव टक्क्याने कमी केल्याने सकारात्मक वातावरणाची निर्मिती होईल आणि रिअल इस्टेट सेक्टरला चालना मिळेल.’
‘नरेडको महाराष्ट्र’चे अध्यक्ष राजन बांदेलकर म्हणाले,‘रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया द्वारे सलग तिसऱ्यांदा २५ आधारभूत अंकांनी रेपो दरात कपात करण्यात आली आहे, त्याचे रिअल इस्टेट तसेच घर खरेदीदारांद्वारे स्वागत होत आहे. रिझर्व्ह बॅंकेने तटस्थ दृष्टिकोन बदलून समायोजित केला आहे, ज्यामुळे बँकांनी एनबीएफसींना निधी पुरवण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे. यामुळे संपूर्ण वित्तीय व्यवस्थेत भांडवलाचा ओघ वाढेल. चांगला मान्सून यापुढील वर्षात कालावधीत दरांमध्ये घट करण्यासाठी अनुकूल ठरेल. नवीन जीएसटी दर आणि स्थिर सरकार यामुळे घर विक्रीला चालना मिळण्याची चिन्हे आहेत.’
‘एकता वर्ल्ड’चे अध्यक्ष अशोक मोहनानी म्हणाले, ‘रिझर्व्ह बँकेने केलेली व्याज दरातील कपात रिअल इस्टेट क्षेत्रासाठी अत्यंत लाभदायी आहे. सरकार आणि नियामकांनी अनेक सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे घर खरेदीला सकारात्मक चालना मिळाली आहे. गृहकर्जाच्या स्वस्त झाल्याने गृह खरेदीदार खरेदीकडे वळतील अशी अपेक्षा आहे.’
‘नाहर ग्रुप’च्या उपाध्यक्षा, मंजू याज्ञिक म्हणाल्या, ‘२०१९ मध्ये आवश्यक हस्तक्षेप आणि घोषणा यामुळे मागणी-पुरवठा यंत्रणा आणि भारतातील घरांच्या बाजारपेठेतील किंमत कार्यक्षमतेतून आवश्यक समतोल आणण्याची अपेक्षा केली गेली आहे. एनडीए सरकारच्या विजयाने भारतातील बाजारपेठांची आशा मजबूत केली असून, फक्त दोन आठवड्यांच्या कालावधीत निफ्टीमध्ये ११,१०० ते १२,१०० इतकी वाढ झाली आहे. व्याजदरांमधील कपातीमुळे निश्चितपणे गृहकर्जांवर बँकांनी आकारलेल्या व्याजदरामध्ये घट होईल आणि यामुळे गृहकर्जाचा मासिक हप्ता कमी होईल. त्यामुळे ग्राहक गृहखरेदीकडे वळतील, परिणामी गृहबांधणी क्षेत्राला चालना मिळेल. यामुळे विकासकांना ही मदत मिळेल.’